mumbai – राज्यात प्लास्टिक बंदी अस्तित्वात असली तरी बाजारपेठेत कृत्रिम (प्लास्टिक) फुलांचा वाढता वापर शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुलांच्या व्यवसायावर परिणाम करत आहे. प्लास्टिक फुलांच्या बंदीसाठी विशेष सूचना काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य प्रविण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य शशिकांत शिंदे, अमित गोरखे, अमोल मिटकरी, सदाभाऊ खोत, अनिल परब यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्लास्टिक बंदीच्या विद्यमान अधिसूचनेअंतर्गतच विशेष अधिसूचना काढून प्लास्टिक व कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्यात येईल. महानगरपालिकांना अशा प्रकारच्या बाजारपेठांवर कारवाई करण्याचे अधिकार दिले जाणार असून, प्लास्टिक फुलांचा वापर करणाऱ्या डेकोरेशन व्यावसायिक, बँक्वेट हॉल्स आणि इतर संबंधित घटकांनाही नोटिस दिली जाईल. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल बंदी अधिसूचना २०१८ नुसार सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक आणि थर्माकोलवर पूर्णतः बंदी आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २९ ऑगस्ट २०२५ रोजी सण-उत्सव काळात कृत्रिम फुलांचा वापर टाळण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत १,२४,७८३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली यापैकी ३,३९० आस्थापनांवर कारवाई करण्यात येऊन १.५५ कोटी दंड वसूल करण्यात आला असून ६७.५४ मेट्रिक टन एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.


