kalyan – कल्याण पूर्वेतील वाहतुकीमध्ये काही बदल होणार आहेत. पुणे लिंक रोडवरील खडवली नाका परिसरातील जुना पूल हटवून तेथे नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात ठाणे शहर वाहतूक शाखेने अधिकृत अधिसूचना जारी केली असून, हे बदल 22 जानेवारीपासून लागू होणार आहेत आणि पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत कायम राहणार आहेत. परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि कोंडी टाळण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडवली नाका येथील पुणे लिंक रोडवरून विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन आणि श्रीराम चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना आनंद दिघे चौक आणि स्मशानभूमी चौकात प्रवेश बंदी असेल. वाहनांना आनंद दिघे उड्डाणपूल आणि सम्राट चौक मार्गे वळवलं जाईल. तसंच श्रीराम चौक आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून खडवली नाका आणि चाकण नाक्याकडे येणाऱ्या वाहनांना श्रीराम चौकात प्रवेश दिला जाणार नाही. ही वाहने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, शांतीनगर उल्हासनगर आणि सम्राट चौक मार्गे वळवली जातील.
हलक्या वाहनांसाठी, कल्याण पूर्वेतील रहिवाशांना कोळशेवाडी पोलीस स्टेशन किंवा विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन पूर्वेकडे किंवा तेथून प्रवास करणाऱ्यांना अंतर्गत रस्त्यांचा वापर करण्याचं सांगण्यात आलं आहे. या मार्गांमध्ये काटेमानवली पुलाखालील हनुमान नगर, चिंचपाडा रोड आणि शंभर फूट रोड मार्गे जाणारा रस्ता समाविष्ट आहे. श्रीराम चौकातून कल्याण पूर्वेकडे येणारी वाहने महिला उद्योग केंद्राजवळील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवरून किंवा खडवलीकडे जाणारा रस्ता वापरू शकतात. केडीएमसी आणि ठाणे शहर पोलिसांकडून नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक बोर्डही लावले जाणार आहेत.
हे वाहतूक बदल 22 जानेवारीच्या मध्यरात्री 12.01 वाजल्यापासून लागू होतील आणि पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत लागू राहतील. या बदलांमधून पोलीस वाहनं, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर आणि ऑक्सिजन वाहनं किंवा इतर आवश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. या वाहनांना हे निर्बंध लागू नसतील.


