pune – संपूर्ण भारताचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९५ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने किल्ले शिवनेरीवर आकर्षक रोषणाई, गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच पारंपारिक वेशभूषेत शिवभक्तांनी सोहळ्याला हजेरी लावली होती. विविध कार्यक्रम पार पडले तसेच विविध साहसी खेळांचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.
कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार,आमदार शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शिवजन्मोत्सवाच्यानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देवून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्यासोबतच उत्तम प्रशासक होते. विविध व्यवस्थापनाचे गुरु होते, शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावले म्हणून आदर्श राजा,जाणता राजा, श्रीमंत योगी म्हणून आपण त्यांचे स्मरण करतो.